खबरदार! नायलॉन मांजा वापराल तर…
अमळनेर नगर परिषद ‘अॅक्शन मोडवर’ हजार रुपये दंडासह गुन्हा दाखल करणार
अमळनेर :- नवीन वर्षातील पहिला आनंदाचा सण म्हणजे मकार संक्रांत. हा सण दिवसभर पतंग उडवून, तर सायंकाळनंतर तीळगूळ वाटून साजरा केला जातो. मात्र मानवासह पक्ष्यांना घातक ठरू पाहणारा नायलॉन मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर करू नये, अन्यथा अमळनेर नगर परिषद प्रशासन अँक्शन मोडवर असून, जर नगर परिषद हद्दीत कुणी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्यास आणि वापर करताना आढळल्यास १,००० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यंदा कोणत्याही नागरिकाला
किंवा पशु-पक्ष्यांना नायलॉन मांजामुळे जखमी किंवा मृत्युमुखी पडण्याची वेळ येऊ नये, यासाठी नगर परिषद मार्फत जाहीर आवाहन आणि सोशल मीडियावर मेसेज पाठवून नायलॉन मांजावर बंदी असल्याचे कळविले आहे. जर नगर परिषद हद्दीमध्ये कुणी नायलॉन मांजाची विक्री अथवा पतंग उडविण्यासाठी वापर केल्यास १,००० रुपयांपर्यंत
दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एकदा दंड झाल्यावर पुन्हा नायलॉन मांजाची विक्री अथवा वापर करताना आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशीही जाहीर सूचना देण्यात आली आहे.
शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेतलेला असल्याने पर्यावरणाचे व पशु-पक्ष्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासन निर्णयानुसार, नायलॉन व तत्सम मांजा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये मकर संक्रांतीच्या निमिताने साजरा करण्यात येणाऱ्या पतंग महोत्सवासाठी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर कुणीहो करू नये. आपल्या परिसरात कोणी व्यावसायिक नायलॉन मांजा विक्री करत असल्यास त्याची माहिती स्वच्छता विभाग, नगरपरिषद अमळनेर कार्यालयास येथे तत्काळ कळविण्यात यावे, असा संदेश नागरिकांना पाठविला आहे यासाठी संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक 9960067316 , किरण खंडारे स्वच्छता निरीक्षक 9371199244 या क्रमांकावर संपर्क साधावा.
नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक नागरिकांना आणि पशु-पक्ष्यांना जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे आपण आनंदोत्सव साजरा करत असताना इतर कुणाला इजा होणार नाही, कुणाचा जीव जाणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या कृत्यामुळे दुसऱ्यांच्या घरात दुःख करण्याची वेळ येणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वतःहून नायलॉन मांजाचा वापर टाळावा असे अमळनेर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांनी जाहीर आवाहन केलेले आहे.

