मारवड महाविद्यालयात “आत्म निर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा समारोप
अमळनेर :-
मारवड, ता. अमळनेर येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभे अंतर्गत आयोजित पाच दिवशीय “आत्म निर्भर युवती अभियान” कार्यशाळेचा आज दि. 1 फेब्रुवारी रोजी प्रा. डॉ. धिरज वैष्णव (अधिसभा सदस्य, क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ, जळगांव) यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही . डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, युवती सभा प्रमुख प्रा. डॉ. नंदा कंधारे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत दिनांक 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असे 5 दिवस युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविण्यात आलेत यात, व्यक्तिमत्व विकास व साॅफ्ट स्किल मार्गदर्शन, प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व आरोग्य तपासणी, स्त्रियांच्या समस्या व उपायोजना, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मारवड येथे भेट व बँक खाते, कर्ज प्रकार, बँकेची विनिमय पद्धती, कृषी विभागाअंतर्गत विविध कृषी योजना, पिकांवरील रोग व त्यावरील उपाय योजना, पीक विमा, पीक कर्ज वगैरेची माहिती तसेच मारवड पोलीस स्टेशनला भेट देऊन महिलांविषयीचे कायदे, सायबर क्राईम, महिला सुरक्षेसाठी योजलेल्या विविध योजनांची माहिती घेण्यात आली.
समारोप समारंभाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नाजमीन पठाण हिने केले.
प्रास्ताविकात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी 5 दिवस राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयात विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महाविद्यालय विद्यापीठाच्या विद्यार्थी विकासाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सहभागी विद्यार्थीनी कु. भाग्यश्री चौधरी, कु. योगिता पवार, कु. नेहा भोई यांनी आत्म निर्भर युवती अभियान कार्यशाळेत शिकायला मिळालेल्या विविध बाबी, आत्मविश्वासात झालेली वाढ, कृषी व बॅक यातील विविध सरकारी उपक्रमांची व सवलतींची माहिती मिळाली, आरोग्य विषयक प्रश्नांची सोडवणूक होवून, आहार विहार व व्यायामाचे महत्त्व कळाले तसेच पोलिस स्टेशनला भेट दिल्यानंतर पोलीस खात्याची भिती नष्ट होवून, महिलांसाठी असलेले विविध कायदे, मुली व स्त्रियांच्या सुरक्षेचे कायदे आणि न्यायालयीन तरतुदी, महिलांचे हेल्पलाइन नंबर्स वगैरे बाबतीत माहिती दिली. या अभियानामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून आम्ही निश्चितच आत्मनिर्भर होवू असा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. धिरज वैष्णव यांनी जागतिकीकरणात स्त्रीला आबला न बनता सबला होणं आवश्यक आहे. तसेच ती सर्वच बाबतीत आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे. असे सांगून मुली आत्मनिर्भर झाल्या तरच ती, उद्याच्या उज्वल भारत घडवू शकेल असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. आबासो. जयवंतराव पाटील यांनी, आपल्या महाविद्यालयाची स्थापनाच मुळात मुलींना दर्जेदार शिक्षण देवून त्यांना समाजात पुढे घेऊन जाण्याच्या उदात्त हेतूने झालेली असल्याचे सांगितले. माझ्या ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण देवून, आत्मनिर्भर होण्यासाठी महाविद्यालय सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. रुपाली निकम हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

