एकमेकांवर आरोप करणाऱ्यांनी तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत – डॉ. अनिल शिंदे
अमळनेर:- अमळनेर मतदारसंघातील आजी माजी आमदार यांच्यात सूतगिरणी आणि रोजगार ह्या मुद्द्यावरून वाद प्रतिवाद सुरू असून दोघांनी आपल्या कार्यकाळात किती उद्योगधंदे आणले याचा खुलासा करावा. जनतेला शाश्वत विकासाची संकल्पना समजेल असा प्रश्नच डॉ. अनिल शिंदे यांनी केला आहे.
तालुक्यात आजी माजी आमदारांत सूतगिरणी प्रश्नावरून वाद सुरू असून चौधरी बंधूंनी या प्रश्र्नी जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र त्यांच्यावर आरोप करणारे मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्यात उद्योगधंदे यावेत, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आजी माजी आमदार दोन्हीही जनतेची दिशाभूल करत असून एकाने जनतेला उल्लू बनवत पाच वर्ष काढली तर दुसऱ्याने फक्त रस्त्याच्या कामांवर फोकस करून शाश्वत विकासाची संकल्पना मांडली. त्यामुळे तालुक्याने नवीन पर्याय देऊन यांची पेन्शन सुरू करावी असे आवाहन डॉ. अनिल शिंदे यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
नवीन उद्योगधंदे यावेत यासाठी करणार प्रयत्न
तालुक्यात अनेक नवीन उद्योगधंदे यावेत यासाठी एमआयडीसी परिसरात सोई सुविधा निर्मिती तसेच उद्योजकांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे.

